नदी प्रदुषण रोखण्यासाठी मैलाशुध्दीकरण प्रकल्पाला आडकाठी नको
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखलीतील मैलाशुध्दीकरण प्रकल्पाला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी विरोध केलेला असतानाच भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. यापूर्वीही नदीपात्रात सोडलेल्या मैलामिश्रीत पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प नदीपात्रातच उभारले आहेत. हा प्रकल्प झाला पाहिजे, त्याला विरोध करणे चुकीचे आहे, असे पक्षनेते पवार यांनी म्हटले आहे.
नदी प्रदुषण रोखण्यासाठी नदीत पात्रात सोडल्या जाणा-या मैलामिश्रीत पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. त्यासाठीच मैलाशुध्दीकरण प्रकल्प उभारले जात आहेत. हे प्रकल्प नदी पात्रात उभारायचे नसतील तर मैलामिश्रीत पाणी तसेच नदीमध्ये सोडायचे का, असा प्रश्न एकनाथ पवार यांनी उपस्थित केला आहे. गटारातले पाणी शुध्दीकरण प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडावे, अशी विरोधी पक्षनेत्यांची धारणा आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मैलामिश्रीत पाण्यावर शुध्दीकरण प्रक्रिया करण्यासाठीचा एसटीपी प्रकल्प हा झाला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.
शहरात नदी सुधार योजना प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे इंद्रायणी आणि पवना नदी पात्राच्या नियोजित परिसरात सुशोभिकरण केले जाणार आहे. हा प्रकल्प सुध्दा नदीपात्रातच राबविला जाणार आहे. मग, त्याठिकाणी लाल रेषा आणि निळी या दोन्ही पूर रेषा आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अनधिकृत ठरत आहे, म्हणून हा प्रकल्प रद्द करायचा का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.