ठेकेदारांच्या बिलांसाठी आयुक्तांची खैरात, स्थायी समिती सभापतींची मुकसंम्मती
- एक महिन्यानंतर आयुक्तांनी विषय ठेवला स्थायीसमोर
- सभापतींनी हा विषय मुकसंम्मतीने केला मंजूर
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक ठेकेदारांची बिले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अडवून ठेवली होती. मार्च 2020 अखेर सर्व बिले सादर करणे बंधनकारक असताना ठेकेदारांनी मुदतीनंतर बिले सादर केली. प्रशासकीय नियमांच्या कचाट्यात सापडल्याने आयुक्तांनी थांबविलेली ठेकेदारांची 208 कोटींची बिले अदा करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव ऐनवेळी स्थायी समितीसमोर ठेवला. स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांनी आज ही मुदतबाह्य बिले अदा करण्यास मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये विविध ठेकेदारांनी गत आर्थिक वर्षात शहरात 690 विकासकामे केली होती. त्यापोटी 208 कोटी 40 लाख रुपये एप्रिल महिन्यात अदा करणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे बिले रोखण्यात आली होती. तथापि, 31 मार्चपूर्वी बिले अदा करणे ठेकेदारांना बंधनकारक असते. मात्र, कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ही बिले अदा करण्यास काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्यावर राज्य शासनाने 3 जून रोजी गतवर्षातील ठेकेदारांची बिले अदा करावीत, असा आदेश काढला. त्यानंतरही गेल्या महिनाभरापासून जाणिवपूर्वक ही बिले अदा करण्यात आली नाहीत. शेवटी आयुक्त हर्डीकर यांनी एक महिन्याच्या कालावधीनंतर सर्व ठेकेदारांची 208 कोटी 40 लाख रुपयांची बिले अदा करण्यास मान्यता घेण्यासाठीचा विषय आजच्या स्थायी समिती समोर एनवेळी ठेवला. त्याला सभापती संतोष लोंढे यांनी कसलाच आक्षेप न घेता मुकसंम्मती दिली.
रखडलेल्या बिले काढून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन नाणेकर यांच्यासह काही ठेकेदारांनी आपली अडचण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे मांडली होती. या प्रकरणी मध्यस्थी करत वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठेकेदारांच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली होती. यानंतर अजित पवार यांनी ठेकेदारांची बिले अदा करण्यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आदेश दिले होते. हे आदेश मिळताच आज (दि. 10) झालेल्या स्थायीच्या सभेत आयत्यावेळी हा विषय घेऊन मंजूर करण्यात आला, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.
भाजपकडून श्रेय लाटण्याचा उद्योग
अजित पवार यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न सुटल्याचा दावा संजोग वाघेरे यांनी केला असून गेल्या महिनाभरापासून आर्थिक हितसंबंधासाठी सत्ताधार्यांनी ठेकेदारांना जाणिवपूर्वक त्रास दिला होता. आता बिले अदा केल्यानंतर भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल वाघेरे यांनी खेद व्यक्त केला आहे. सत्ताधार्यांनी कोरोनाकाळात कोणालाही वेठीस न धरजा जनहिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.