जनसंघर्ष यात्रेतून जनतेच्या अन्यायाला वाचा फूटणार
शुक्रवारी सांगवीत कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रेची सभा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – सत्तेचा गैरवापर करीत मागील चार वर्षात भाजप सरकारने जनतेवर अन्याय केला. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोल्हापूरातून प्रदेश कॉंग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरु केलीय. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून शुक्रवारी 7 सप्टेंबरला पिंपरी चिंचवडला येणार आहे, अशी माहिती कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.
यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, लक्ष्मण रुपनर, नरेंद्र बनसोडे, मयूर जैसवाल, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, मकर यादव, सुंदर कांबळे, बाळासाहेब साळुंखे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले सभागृहात जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी (दि.7 ) सायंकाळी 5 वाजता सभेचे आयोजन केले आहे. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लीकार्जून खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, सरचिटणीस रत्नाकर महाजन आदींसह प्रदेश कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जनसंघर्ष यात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या काळात समाजात जातीय सलोखा राहिला नाही. नोटाबंदीने अनेकांचा रोजगार जावून बेकारी आली आहे. निवडणुकांमध्ये दिलेले एकही आश्वासन भाजप सरकारला पूर्ण केले नाही. देशात शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाई वाढली आहे. बांधकाम क्षेत्रासह उद्योग व्यापारात देखील मंदीचे सावट आहे. करदात्यांच्या पैशातून फसवी जाहिरातबाजी करून भाजपाने नागरिकांना फसविले आहे. अशी स्थिती निर्माण झाले आहे.
सरकारने नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षांची यादी जाहिर केली. यात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली आहे. याबाबत साठे म्हणाले की, भाजपने दबावतंत्र वापरून नवनगर प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन करण्याचा कुटील डाव पालकमंत्र्यांनी आखला होता. त्याला कॉंग्रेसने विरोध केला होता. मात्र, नागरिकांच्या दबावामुळे सरकारला ते शक्य झाले नाही. प्राधिकरणाच्या ताब्यात असणा-या भूमीपुत्रांच्या जमिनी, प्राधिकरणाच्या ठेवी व मालमत्ता गिळंकृत करण्याचा शासनाचा डाव होता. तो आम्ही हाणून पाडला आहे. तसेच खाडे यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांनी प्राधिकरणाशी संबंधित साडेबारा टक्क्यांचा परतावा, प्राधिकरण हद्दीतील अतिक्रमणे, आवश्यक विकास प्रकल्प, सदनिका, प्लॉट हस्तांतरण शुल्क आकारणी असे विविध प्रश्न मार्गी लागावेत अशीही अपेक्षा साठे यांनी व्यक्त केली.