खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
मी स्वत: खेळाडू असल्याने मला खेळाबद्दल विशेष आस्था आहे. त्यामुळे मी या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका, क्रिडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या महापौर चषक अंतरशालेय क्रिडा स्पर्धा (टिन-२०) च्या स्पर्धांचे बक्षिस वितरण छत्रपती शिवाजी क्रिडासंकूल, म्हाळूंगे, बालेवाडी येथे त्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, राजू मिसाळ, विकास डोळस, सागर गवळी, नामदेव ढाके, नगरसदस्या सुषमा तनपुरे, आरती चोंधे, अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, हिंद केसरी पै. अमोल बुचडे, कॅप्टन गोपाल देवांग, पार्श्व गायक संदिप उबाळे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, शिक्षण अधिकारी पराग मुंढे, प्रशासन अधिकारी (क्रिडा) सुनंदा गवळी, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते परशुराम वाडेकर, स्पर्धेतील सर्व सहभागी शाळांचे क्रिडा पर्यवेक्षक व शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, धावणे, जलतरण, कुस्ती, बुद्धीबळ, योगासन, बॅडमिंटन यासारख्या वेगवेगळ्या २० खेळांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरूवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. सर्व प्रथम सीएमएस स्कूल, निगडीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय, पिंपळे सौदागरच्या विद्यार्थ्यांनी गजर विठूमाउलीचा हे गीत सादर केले, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माँ तूझे सलाम या गीतावर स्केटींग नृत्य सादर करुन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मनोज देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतील मल्लखांब या खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. यापुढे ही नगरी सांस्कृतिक व क्रिडानगरी म्हणूनही ओळखली जाईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. उपमहापौरांनी केलेल्या भाषणात आंतरशालेय विद्यार्थ्यांनी गेल्या २० दिवसांपासून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून त्यामुळे या स्पर्धेत चुरस व रंगत आली असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम रैना, अक्षय मोरे व दत्तात्रय जगताप यांनी केले. पार्श्व गायक संदिप उबाळे यांच्या छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या शिर्षकगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.