केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसचा ‘आक्रोश’ मशाल मोर्चा
![Youth Congress 'Akrosh' Mashal Morcha against the Central Government Modi Government, Winter Session of Parliament, Akrosh Mashal, Youth Congress, Youth Congress Secretary Akshay Jain, NSUI State Vice President Umesh Khandare, Pimpri Assembly Youth Congress President Hirachand Jadhav, Labor Leader Pralhad Kamble, Baliram Kakade,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/युवक.jpg)
पिंपरी | प्रातिनिधी
केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी-कामगारांच्या काळ्या कायद्यांविरोधात व संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपरीत शहर युवक काँग्रेसच्या वतीने आक्रोश या मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चौक ते एचए कंपनी प्रवेशद्वारा जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत हा आक्रोश मशाल काढण्यात आला. या वेळी मोदी सरकार मुर्दाबाद, कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्या, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करणा-या मोदी सरकारचा निषेध असो, किसान के सन्मान मे युवक काँग्रेस मैदान मे अशा घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अक्षय जैन, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, कामगार नेते प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, युवक कांग्रेसचे शहर सरचिटणीस स्वप्निल बनसोडे, दिपक भंडारी, मिंलिद बनसोडे, अर्णव कामठे, रोहन वाघमारे, प्रविण जाधव, पांडूरंग वीर, रहीम चौधरी, बाबू खान, आदि पदाधिकारी व बहूसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.
मोर्चाचे आयोजक व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, भारतीय लोकशाहीतील सर्वात वाईट पर्व सध्या सुरू आहे. सर्वच स्तरांवर मोदींचे सरकार अपयशी ठरले आहे. महागाईने देश हवालदिल झाला आहे. त्यामध्ये हे भांडवलदार धार्जिणे कायदे आणून मोदी सरकार नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहेत. शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांविरोधात शेतकरी प्रंचड मोठ्या संख्येने गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. या बाबत चर्चा होऊन सदर चुकीचे कायदे बदलणे कामी अत्यंत महत्वाचे असलेले. हे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकारने शेतकरी व संपूर्ण देशांतल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदींमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिम्मत नाही. त्यामुळेच त्यांनी अधिवेशनच रद्द करून पळपुटेपणाचा पुरावा दिला आहे. आजचा आक्रोश मोर्चा हा तमाम शेतकरी, कामगार व लोकशाहीच्या गैरवापरातून होणा-या सामान्य नागरिकांची मुस्कटदाबीचा निषेधार्थ आहे” असे बनसोडे म्हणाले.