कुख्यात गुन्हेगार युनिट 2 च्या ताब्यात, एक पिस्टल आणि काडतूस हस्तगत
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दोघांचा खून करून पसार झालेला कुख्यात गुन्हेगार खुलेआम पिस्टल घेऊन दहशत पसरवत असताना युनिट दोनच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे एक पिस्टल व एक जीवंत काडतूस मिळून आले आहे. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई निगडीतील ओटा स्किम येथे मंगळवारी (दि. 25) करण्यात आली.
संतोष मधुकर मांजरे (वय 29, रा. मुळ मांजरेवाडी, सध्या कोरेगाव खुर्द, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हेगाराचे नाव आहे. संतोष काल निगडीच्या ओटास्कीम परिसरात येणार असून त्याच्याजवळ बेकायदेशीर पिस्टल असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. डी. निलपत्रेवार आणि हवालदार शिवानंद स्वामी यांना खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली. त्यावर पोलिसांनी सतर्क राहून ओटास्कीम परिसरात सापळा रचला. तेवढ्यात सम्राट अशोक बिल्डींगजवळ संतोष रिक्षामधून खाली उतरला. तो कोणाची तरी वाट पाहत उभा होता.
त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. शेवटी पोलिसांनी खाक्या दम दाखविताच संतोषने कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्टल काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. पिस्टच्या मॅग्झीनमध्ये एक जीवंत काडतूस पोलिसांना मिळाले.
संतोष मांजरे आणि त्याचा साथिदार मंगेश गाडे दोघांनी 2013 मध्ये दत्तात्रय नामदेव घनवट यांचा कोरेगाव खुर्द येथे धारदार कोयत्याने खून केला होता. संतोष या गुन्ह्यात फरार होता. दरम्यान, त्याने कैलास जावळे आणि सागर जावळे या तिघांनी 2013 मध्ये राजकीय वादातून धनंजय वसंत आवटे (रा. कुरकुंडी) यांचा पिस्तुलातून गोळ्या घालून आणि कोयत्याने गंभीर वार करून खून केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संतोषच्या मुसक्या आवळण्यात युनिट दोनच्या पोलीस पथकाला यश आले आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, सहायक पोलीस फौजदार दिलीप चौधरी, संपत निकम, संजय पंधरे, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, महिला पोलीस हवालदार उषा दळे, विपुल जाधव, आतिष कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, नामदेव राऊत, नामदेव कापसे यांच्या पथकाने केली.