औंध जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांची गर्दी
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
औंध जिल्हा रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्याच ठिकाणी शहरातील परराज्य व जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जवळ असणे बंधनकारक केल्याने नागरिकांची येथे गर्दी उसळली आहे. त्यामुळे मागील एक ते दीड महिन्यापासून करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पाळलेल्या नागरिकांवर या गर्दीमुळे अन्याय तर होणार नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावी अडकलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी व बाहेरून आपल्या लोकांना परत आण्यासाठी उपविभागीय कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांसाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, त्याकरिता परगावी जाणाऱ्या नागरिकांनी औंध जिल्हा रुग्णालयात कोणतेही नियमांचे पालन न करता तसेच फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता मोठी गर्दी केलेली दिसली. तिथे गर्दीचा महापूर पाहायला मिळला. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची गरज असल्याचे दिसून आले.
नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. बाहेर गावाला जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. परंतु वायसीएम रुग्णालयात आणि नवीन भोसरी रुग्णालयात करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने वैद्यकीय प्रमाणपत्रकरिता नागरिकांनी या ठिकाणी गर्दी न करता सहकार्य करावे, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच औंध जिल्हा रुग्णालयातही करोनाचे रुग्ण असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये. परंतु नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे जमा झाले आहेत.