breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अभियंत्याच्या ज्ञानाचा उपयोग भारत महासत्ता करण्यास निश्चित होईल – नितीन बानगुडे
राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात साजरा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिक्षणात सृजनशिलतेला आणि नाविण्याला महत्व दिले, तर नवनिर्माणाचा ध्यास असणारे अभियंते निर्माण होतील. त्या अभियंत्यांच्या ज्ञानाचा उपयोग राज्यकर्त्यांनी करुन घेतल्यास भारत जगात निश्चित तिसरा महासत्ता म्हणून उदयास येईल, असे मत कृृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया जयंती आणि राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त महानगरपालिका व ज्यु. इंजिनिअर्स असोशिएशनच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बोलत होते. यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, कुंदन गायकवाड, असोशिएशनचे अध्यक्ष जयकुमार गुजर, कार्याध्यक्ष सुनिल बेळगावकर, सचिव संतोष कुदळे, खजिनदार शामसुंदर बनसोडे, सहशहर अभियंता प्रविण तुपे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर झुंझारे, संजय कुलकर्णी, संजय कांबळे, सतिश इंगळे, मकरंद निकम, डी.एन.गट्टूवार, प्रमोद ओंबासे, पी.पी.पाटील, प्रविण लडकत आदी उपस्थित होते.
प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, भारतात अभियांत्रिकी क्षेत्र प्राचिनकाळापासून अस्तित्वात आहे. साडेतीनशे वर्षांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची उभारणी करताना पाणी योजना, बंदिस्त गटार योजना, दळणवळण यंत्रणा, संरक्षण यासाठी भौगोलिक व खगोल शास्त्राचा अभ्यास करुन अभियांत्रिकीचा उत्तम वापर केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिरोजी इंदलकर यांनी आपल्या कार्याच्या प्रती निष्ठा ठेवून दगडादगडात प्रामाणिकपणा भरुन केलेली रायगडाची बांधणी हे उत्तम वास्तुविशारदाचे उदाहरण आहे. समुद्र तटावर उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला, रत्नागिरी येथे जहाज बांधणी, सुरत मधील छापखाना, जमिन मोजणी व महसूलाची सुधारित पध्दती, खेड शिवापूर येथे बांधलेले महाराष्ट्रातील पहिले धरण हि महाराजांच्या दुरदृष्टीची, सामुहिक शक्तीच्या व्यवस्थापनाची आणि धैर्याची उदाहरणे आहेत. आपले निश्चित ध्येय, उद्दिष्ट गाठण्यासाठी कमीतकमी खर्चात उत्तम नियोजन, कुशल व्यवस्थापन करुन यशस्वी कसे व्हावे यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करावा. उद्याच्या पिढ्यांना हा समग्र इतिहास कळण्यासाठी गडकोट किल्ल्यांचे संरक्षण केले पाहिजे व हि शिवस्मारके जोपासली पाहिजेत अशी अपेक्षा प्रा. बानगुडे यांनी व्यक्त केली. तसेच भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया यांनी शिष्यवृत्ती मिळवून पुण्यात शिक्षण घेतले. खडकवासला धरणाचे अतिरिक्त पाणी अडविण्यासाठी त्यांनी उभारलेला दरवाजा आजही विश्वेश्वरैया दरवाजा म्हणून ओळखला जातो अशीहि माहिती प्रा. बानगुडे यांनी दिली. स्वागत जयकुमार गुजर, सुत्रसंचालन किरण आंदोरे, पल्लवी ताटे आणि आभार सुनिल बेळगावकर यांनी मानले.