अण्णा भाऊ साठे खर्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व होते – मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/IMG-20190801-WA0016.jpg)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित
पिंपरी, (महाईन्यूज) – अण्णा भाऊ साठे हे लोकशाहीर म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. लोकशाहीर हे बिरूद त्यांच्या नावामागे नेहमीसाठीच आहे. त्यांनी शाहिरीला वैभव प्राप्त करून दिले. परंतु त्यांचे जीवन कायमच संघर्षमय राहिले. महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णाभाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली, असे गौरवोद्गार मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षारंभ कार्यक्रमावेळी काढले.
आजपासून आणा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. त्यानिमित्त मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री दिलीप कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष मधुकर कांबळे, पोस्टाच्या मुंबई विभागाच्या स्वाती पांडे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, आमदार सुधाकर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि अण्णा भाऊंना मानणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, पृथ्वी हि शेषनागाच्या नाही, तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे, अशी अंत्योदयाची व्याख्या अण्णाभाऊंनी त्यांच्या काळातच केली आहे. कथा, नाट्य, लोक नाट्य , कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच साहित्य प्रकार समृद्ध करणारे साहित्यरत्न म्हणून अण्णा भाऊंची ओळख आहे. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय त्यांना जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान मोलाचे आहे. अशा साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणा-या लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीची सुरुवात आज मुख्यत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे.
जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने हा टपाल तिकिटाच्या प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. त्याचसोबत आज जन्मशताब्दी सोहळ्याचा लोगो अनावरण, महामंडळाच्या वेबसाईटचे अनावरण तसेच गुणवंत विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरणाचा सोहळा आज मुख्यंमत्री तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी अण्णा भाऊंची जन्मशताब्दी साजरी होत आहे ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळा भागभांडवल ३०० कोटी वरून ५०० कोटी करावे, २००६ ते २०१२ कालावधी मधील कर्जांना कर्जमाफी मिळावी, अण्णाभाऊ आणि लहुजी स्मारक यांच्या कामास गती मिळावी, अबकड आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा तसेच लहुजी आयोगाचे पुनर्गठन व्हावे आणि अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी गोरखे यांनी केली.
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे लिहिले व गायिले. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली तळपती तलवार होती. कामगार चळवळीत त्यांचे व्यक्तिमत्त्व ढाळले गेले होते. ते साम्यवादी होते. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा प्रत्येक नेता हा अण्णाभाऊंच्या शाहिरीचा जणू नायक होता.