महिन्याभरात मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये दोनदा नामुष्की!
![Within a month, the Bombay Municipal Corporation has been shamed twice in the High Court!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-13-at-4.24.51-PM.jpeg)
मुंबई । राज्यात गेल्या साडेतीन महिन्यांपासून राजकीय धुळवड रंगली आहे. आरोप-प्रत्यारोपाची जोरदार चिखलफेक होत असताना प्रशासनाला देखील याचा फटका बसत आहे. याचा प्रत्यय खुद्द मुंबई महापालिकेच आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना आला आहे. दसरा मेळाव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता महिन्याभरातच ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने पुन्हा एकदा पालिकेला नामुष्की पत्करावी लागली आहे.
गेल्या महिन्यात 15 तारखेला रवींद्र नाट्यमंदिरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुंबई पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकार-षटकार लगावले होते. ‘म्हणूनच चहलसाहेब तुमचा सत्कार केला…,’ असे त्यांनी तीन-चार वेळा म्हटले होते. एकीकडे असे कौतुक होत असताना, उच्च न्यायालयाने मात्र पालिका प्रशासनाचे दोनदा कान उपटले आहे.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आले होते. पण कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत, पालिका प्रशासनाने दोघांनाही नकार दिला. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य आहे. मात्र, पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही. पालिकेने अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
तर, आता शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरूनही उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाची कानउघाडणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला होता. पण पालिका प्रशासनाने तो मंजूर केला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा उद्या (शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022) सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे महिन्याभरातच पालिका प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयाचा दुसरा निकाल आला आहे.