संजय बियाणी यांचे मारेकरी कोण; गृहमंत्र्यांनी तपासाबाबत उचलले मोठे पाऊल
![Who is the killer of Sanjay Biyani; Home Minister takes big step regarding investigation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Who-is-the-killer-of-Sanjay-Biyani-Home-Minister-takes-big-step-regarding-investigation.jpg)
मुंबई| नांदेड येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, या हत्या प्रकरणी गठीत झालेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित आढावा घेणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर अशोक चव्हाण यांची आज दुपारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी बियाणी हत्याकांडाचा घटनाक्रम तसेच बियाणी कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा आढावा घेतला.
संजय बियाणी यांचे मारेकरी व या हत्याकांडाचे सूत्रधार लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी गृहमंत्री या नात्याने आपण या तपासाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी केली व गृहमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, संजय बियाणी यांची हत्या अतिशय गंभीर असून, त्यांचे मारेकरी कोण व या हत्येचा हेतु काय? याचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे.
नेमकं काय घडलं होतं?
संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी दिवसाढवळ्या घरासमोरच हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बियाणी यांच्यावर जवळून चार गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाले होते. बियाणी यांना नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बियाणी यांच्यावर हल्ला झाला त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप हल्लेखोर हाती लागू शकलेले नाहीत. ही हत्या सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप बियाणी यांच्या पत्नीने केला असून याप्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
सुरक्षा काढताच गोळी घातली; बिल्डर संजय बियाणी यांचं वैर नेमकं कुणाशी होतं?