योगी आणि महाराज राजकारणात येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरू होतं, प्रणिती शिंदे यांची घणाघाती टीका
![The day the yogis and maharajas enter politics, the country's turmoil begins](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/praniti-shinde.png)
मुंबई | ज्या दिवशी योगी आणि महाराज राजकारणात येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरू होतं, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्यांचा रोख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर होता. त्या रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. सोलापुरातील हेरिटेज हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
शेतीविषयक तीन काळे कायदे उत्तर प्रदेशच्या निवडणुका लागल्यावर रद्द करण्यात आले. आंदोलनादरम्यान सातशे शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर हे कायदे रद्द करण्यात आले. देशाला तोडण्याच्या घोषणा हे लोक करत आहेत. योगी महाराजांबद्दल आम्हाला मान आहे, पण त्यांचं स्थान मंदिर आणि मठात आहे. राजकारणात नाही,” असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “ज्या दिवशी राजकारणात योगी आणि महाराज येतात, त्या दिवशी देशाचं वाटोळ सुरू होतं. जे काम करतात, त्यांना मतदान करणं महत्त्वाचं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या”, असं त्या म्हणाल्या.
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पुन्हा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ३७ वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवून मुख्यमंत्री होण्याचा इतिहास योगींनी घडवला असून, सध्या शपथविधी सोहळ्याची तयारी उत्तर प्रदेशात सुरू आहे.