‘धन्यवाद उद्धवजी, पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात’, जयश्री जाधव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
![Thank you Uddhavji, you stood firmly behind me ', Jayashree Jadhav called on the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Thank-you-Uddhavji-you-stood-firmly-behind-me-Jayashree-Jadhav-called-on-the-Chief-Minister.jpg)
मुंबई | कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधवयांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकीत आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. तसंच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाबद्दल जयश्री जाधव यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूरचं मैदान मारल्यानंतर काल (मंगळवारी) जयश्री जाधव मुंबईत आल्या. काल त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. आपल्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी आज दुपारी भेट घेतली. निवडणुकीत आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी जयश्री जाधव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.
भेटीगाठींचा सिलसिला
तत्पूर्वी, नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत अजितदादांनी जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही जयश्री जाधव यांची भेट घेतली. पवारसाहेबांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, असं जयश्री जाधव यांनी सांगितलं.
कोल्हापूरच्या मैदानात भाजप चितपट, काँग्रेसने मैदान मारलं!
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत नाना कदम यांना आस्मान दाखवलं. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. जयश्री जाधव यांच्या विजयासाठी तिन्ही पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. प्रामुख्याने शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि काँग्रसचे नेते बंटी पाटील यांनी दिवस रात्र एक करत जनतेपर्यंत पोहोचून जयश्री जाधव यांचा प्रचार केला. तिन्ही पक्षांच्या सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर अखेर महाविकास आघाडीने भाजपला कोल्हापूरच्या मैदानात चितपट केलेच…!