सफाई कामगार वसाहत पुनर्विकासाला गती! सल्लागार नियुक्तीसाठी २९ कोटी
मुंबई | पालिका सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी साडेतीन ते चार हजार कोटी खर्च येणार आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. ९ गटांतील या वसाहतींच्या विकासासाठी नेमल्या जाणाऱ्या सल्लागाराच्या शुल्कासाठी २९ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील कामगार दोन शिफ्टमध्ये शहर स्वच्छ करण्याचे काम करतात. कामाच्या ठिकाणापासून जवळ राहण्याची व्यवस्था करण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने ४६ सफाई कामगार वसाहती बांधल्या आहेत. त्यात २९ हजार ६१८ पैकी ५ हजार ५९२ सफाई कामगार तिथे राहतात. या वसाहती १९६२ पूर्वीच्या आहेत. त्यात १५० चौरस फुटांची घरे आहेत. मात्र सफाई कामगार कुटुंबांना आता ती अपुरी पडत आहेत. त्यामुळे पालिकेने आश्रय योजनेअंतर्गत या सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साडेतीन ते चार हजार कोटींच्या कामाला मंजुरी दिली आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांचे शुल्क २९ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सफाई कामगारांच्या ४६ पैकी ३९ वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात मुंबई शहरातील २०, पश्चिम उपनगरातील ११ आणि पूर्व उपनगरातील ८ वसाहतींचा समावेश आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी पालिका २९ कोटी २२ लाख खर्च करणार आहे.