रिक्षा, टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनला आजपासून सुरूवात
मुंबई महानगरात १ ऑक्टोबरपासून रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू करण्यात आली. मात्र सुधारित भाडे दरासाठी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करावे (रिकॅलिब्रेशन) लागणार असून १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान मीटरमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचन चालकांना करण्यात आल्या होत्या. परंतु मीटरमधील चिपची सुधारणा, चाचणी, तपासणी करण्यासाठी उत्पादकांकडूनच विलंब झाल्याने मीटर बदल प्रक्रिया रखडली होती. मीटरमधील बदल प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत क्यूआर कोड असलेला सुधारित अधिकृत भाडेदर तक्ता संघटनांमार्फत घेण्याची सूचना चालकांना करण्यात आली होती. परंतु मुंबईत काही रिक्षा, टॅक्सीचालक मीटरमध्ये बदल न करताच आणि क्यूआर कोड नसलेला भाडेदर तक्ता दाखवून नव्या भाड्याची आकारणी करीत आहेत.
रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी, तर टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ करण्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे रिक्षाचे पहिल्या टप्प्यातील दीड किलोमीटरसाठी किमान भाडे २१ रुपयांऐवजी २३ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांऐवजी २८ रुपये झाले आहे. कुल कॅबचेही भाडेदर महागले असून सध्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे ३३ रुपयांऐवजी ४० रुपये झाले आहे. नवीन भाडेदर आकारणीसाठी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करावे (रिकॅलिब्रेशन) लागणार आहेत. हे बदल १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान करण्याच्या सूचन करण्यात आल्या आहेत. हे बदल करण्यासाठी मीटरमध्ये एक चीप बसवण्यात येते. परंतु मीटरमधील विविध चाचण्यांमुळे उत्पादकांकडून ही प्रक्रिया काहीशी लांबली आहे. परिणामी, मुंबई महानगरात रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल झालेले नाहीत. त्यामुळे नवीन भाड्याची आकारणीही होऊ शकलेली नाही. मीटर बदलाची ही प्रक्रिया १२ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मीटरमध्ये बदल होईपर्यंत क्यूआर कोड असलेला सुधारित अधिकृत भाडेदर तक्ता वापरण्याच्या सूचना परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सीचालकांना केल्या आहेत. त्यानुसार क्यूआर कोड असलेले भाडेदर तक्ता संघटनांमार्फत चालकांना उपलब्धही केला आहे. मात्र चालक क्यूआर कोड नसलेला भाडेदर तक्ता वापरत असून त्यानुसारच प्रवाशांकडून भाडे वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी व चालकांमध्ये वाद होत आहेत. यासंदर्भात परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता बाबत माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.