गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल
![Why aren't passes given to those who travel to Mumbai every day from Pune and Nashik ?, Mumbai High Court asks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/train-3.jpg)
सिंधुदुर्ग – यंदा सलग दुसऱ्या वर्षी सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे, मात्र गेल्या गणेशोत्सवात कोकणात जायला न मिळालेल्या चाकरमान्यांनी यंदा सुरुवातीपासूनच गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच फुल्ल झाले आहे.
रेल्वेने 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली आहे. काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना शेकडोंच्या घरात प्रवासी वेटिंगवर आहेत. तर परतीच्या प्रवासासाठीही 14 तारखेपासून पुढील सहा-सात दिवसांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
यंदा 10 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. कोकणातील प्रत्येक घरात गणपती बसवला जात असल्याने या काळात शहरातील लोक आपापल्या गावी जातात. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असल्यामुळे शहरातील लोकांना कोकणात जाण्यास मज्जाव करण्याला आला होता. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला होता. मात्र, यंदा रेल्वेगाड्यांसाठी आतापासूनच बुकिंग होताना दिसत आहे.