राऊतांची राठ; ठाकरेंवर खोचक टीका
![Raut's Rath; Strict criticism on Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Rauts-Rath-Strict-criticism-on-Thackeray.jpg)
मुंबई |मनसेच्या पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा केली. तसंच, राज यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर जळजळीत टीका केली. तसंच, उत्तर प्रदेश सरकारचंही कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनीही राज यांच्या भाषणाचा समाचार घेतला. तर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, आता आम्हाला थोडासा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते, भारतीय जनता पार्टी आणि आमच्यात काय झाले ते आम्ही बघून घेऊ, तिसऱ्याची आम्हाला गरज नाही, आमच्यात जे काही झालं ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही यात पडायची गरज नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
शरद पवारांनी जातीयवाद बसवला, त्यात शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात, सल्लामसलत करण्यासाठी, कशा करता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं? एवढ्या मोठ्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या देखील स्पॉन्सर्ड आहेत. काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता, महाराष्ट्राला एकच कळलं की अक्कलदाढ उशिरा येते, असा टोमणा संजय राऊतांनी लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली, हे आता स्पष्ट दिसते आहे. आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे, राज्यांवर जी संकट येत आहेत त्यांच्याशी लढा द्यायचा आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या घुसखोरी आणि अतिक्रमणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे आणि हे करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.