मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात सुरू करण्यासाठी पुण्यातील वकिलांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मंगळवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात पार पडलेल्या बैठकीत कायमस्वरुपी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशनने घेतला.राज्याच्या विधीमंडळाने १९७८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे आणि औरंगाबाद येथे स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. ४४ वर्षे उलटले तरी पुण्याचे खंडपीठ अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील पक्षकारांची मोठी गैरसोय होत आहे.
उच्च न्यायालयाचे खंडपीठ शहरात लवकर सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनकडून मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. डॉ. सुधाकर आव्हाड, ॲड. डी. डी. शिंदे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, ॲड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड अमोल शितोळे, ॲड. सुरेखा भोसले, ॲड. प्रथमेश भोईटे, ॲड. शिल्पा कदम आदी या प्रसंगी उपस्थित होते.
खंडपीठाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यासाठी लवकरच कायमस्वरुपी कृती समिती स्थापन करण्यात येईल. पुण्यात खंडपीठ होण्यासाठी या समितीकडून कामकाजाची दिशा ठरवली जाईल, असे ॲड. थोरवे यांनी सांगितले. पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होणे गरजेचे असल्याचे मत ॲड. सुधाकर आव्हाड, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केले.