मिठाईवर खर्च करून लोकांचे आरोग्य जपा, फटाकेबंदीविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
दिल्लीतील फटाक्यांच्या बंदीला आव्हान देणारी याचिका भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी केली होती दरम्यान या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लोकांना मोकळ्या हवेत श्वास घेऊ द्यावा आणि तेच पैसे मिठाईवर खर्च करण्यात यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मनोज तिवारी यांचे वकील शशांक शेखर झा यांनी दिवाळीच सण जवळ आल्याचे कारण देत तातडीने सुनावणीची मागणी केली होती. मनोज तिवारी यांनी 23 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकारणी धाव घेतली होती.
विशेष म्हणजे जगण्याच्या अधिकाराच्या निमित्ताने धर्मस्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकत नाही, असे याचिकेत म्हटले होते. मनोज तिवारी यांनी फटाके विक्री, खरेदी आणि फोडण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश सरकारकडे मागितले होते. सर्वोच्च न्यायालयानेच पर्यावरणपूरक फटाके वापरण्यास परवानगी दिलेली असताना त्यांनी सर्वसाधारण बंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आगामी सणासुदीच्या काळात फटाके विकणार्या किंवा फोडणाऱ्या सामान्य लोकांवर एफआयआर नोंदवण्यासारखी कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 2020 पासून दिल्लीत दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी आहे. यासोबतच हरियाणानेही मागील वर्षी आपल्या 14 जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली होती. मात्र, निर्बंध असतानाही दिल्ली, नोएडा, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये रात्री उशिरापर्यंत लोकांनी फटाके फोडले.
दिल्लीत दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांना 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो. बुधवारी ही माहिती देताना दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, दिल्लीत फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड आणि स्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबतच त्यांनी लोकांना या दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी दिल्ली सरकार कडून जनजागृती करण्यात येणार आहे. कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कपासून याची सुरुवात होईल. येथे 51 हजार दिवे लावण्यात येणार आहेत.