उष्णतेमुळे मुंबईकरांना भेडसावत आहे ‘हा’ त्रास; रुग्णांचे प्रमाण वाढले
![Mumbaikars are facing 'this' problem due to heat; The number of patients increased](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Mumbaikars-are-facing-this-problem-due-to-heat-The-number-of-patients-increased.jpg)
मुंबई |वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना प्रचंड उष्णतेमुळे विविध प्रकारच्या प्रकृतीच्या समस्या भेडसावत आहे. उच्च रक्तदाबाची समस्या वाढत असून, खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे.
मुंबईसह राज्यभरात सध्या उष्णतेची लाट आहे. मुंबईत तापमानाचा पारा नुकताच ४१ अंशांपर्यंत पोहोचला होता. वाढत्या उष्णतेमुळे विविध प्रकारच्या शारीरिक समस्या भेडसावतात. त्यात रक्तदाबाच्या तक्रारी सर्वाधिक असतात याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. वाढत्या उष्णतेच्या वातावरणातही तिखट, तेलकट पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळेही खूप त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. फिजिशिअन डॉ. आर. एस. पवार यांनी, आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांचा हा त्रास उष्ण वातावरणात आणखी बळावतो, असे सांगितले. ‘ज्यांना हा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे, त्यांनी योग्य वेळी त्याकडे लक्ष न दिल्याने या लक्षणांची तीव्रता वाढते. त्यामुळे रक्तदाब, मधुमेहाचा त्रास आहे का याची चाचपणी करायला हवी’, असे सांगत डॉ. पवार यांनी याकडे लक्ष वेधले.
गोळी चुकवू नका
उष्म्यामुळे, शरीरातून घामावाटे पाणी बाहेर जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर शारीरिक त्रास होऊ शकतो. ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी ही गोळी चुकवू नका. रक्तदाब वाढून त्यामुळे इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.