#Lockdown बांद्रा प्रकरण | सोशल मीडियावरील ३० अकाऊंटवर सायबर सेलची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/bandra-1.jpg)
मुंबई | कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर सेलने राज्यात २०१ तर, बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्याशिवाय मंगळवारी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची मुदत वाढल्याचं जाहीर केल्यानंतर मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर उसळलेल्या गर्दी प्रकरणीही धडक कारवाई केली आहे. ज्याअंतर्गत सोशल मीडियावरील जवळपास ३० अकाऊंटवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही गुन्हेगार, समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, याच समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे. महाराष्ट्र सायबर विभाग टिकटॉक , फेसबुक , ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.