“आज बाळासाहेब असते तर या…”; भाजपाने ढोंगाशी ‘निकाह’ लावल्याचा टोला लगावत शिवसेनेनं CM शिंदेंना केलं लक्ष्य
![“If Balasaheb were here today…”; Shiv Sena has targeted CM Shinde by accusing BJP of pretending to marry 'Nikah'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Uddhav-Thackeray-4-780x470.jpg)
महाराष्ट्राच्या मातीत ढोंगाला स्थान नाही. ढोंगाला लाथ मारा असे बाळासाहेब जाहीरपणे सांगायचे अशी आठवण करुन देत शिवसेनेनं म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवणं हा राष्ट्रद्रोह असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता महान योद्ध्याप्रमाणे देह ठेवला
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. संकटांचे पहाड कोसळले तरी त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे त्यांचे नेतृत्व. अनेक वाद, वादळे आणि वावटळी त्यांनी अंगावर घेतल्या व परतवून लावल्या. मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ आणि त्याच्या खऱ्या कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट. त्या वेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीतही तेच घडले. ज्या महाराष्ट्राच्या मातीचे, ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत, तो महाराष्ट्र, मराठी समाज विस्कळीत झाला आहे. त्याला राजदरबारात पिंमत नाही. त्याला सार्वजनिक मत नाही. त्याला रोज अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागत आहे. ‘स्वाभिमान’ आणि ‘तेज’ या शब्दांशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. त्याला रोज लाथाडले जात आहे, हे बाळासाहेबांनी पाहिले, मनावर घेतले. परिणामी मराठी माणूस व महाराष्ट्रावरील अन्यायाविरुद्ध लढायचे आणि त्यासाठी शिवसेनेच्या विचारांची मशाल धडधडत ठेवायची हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आमरण झटत राहावयाचे असा त्यांनी त्या वेळी निर्धार केला. त्याच निर्धाराने ते लढत राहिले. शिवसेनेला लढत ठेवले व शेवटी लढता लढता एका महान योद्ध्याप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.