‘मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा फडणवीस कशी करू शकतात ?’
मुंबई – माजी गृहमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात?, असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. या टीकेला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: राज्याचे गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. 5 वर्षे याच पोलिसांनी त्यांना प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली, साथ दिली. ते माजी गृहमंत्री मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात?, असा सवाल अनिल देशमुखांनी केली.
महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे, तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही. देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत, अशी घणाघाती टीका अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केली.
दरम्यान, हिरेन मृत्यू प्रकरणावरून फडणवीसांनी सभागृहात ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांना पोलीस अधिकारी वाझेंना अटक करण्याची देखील यावेळी मागणी केली.