राज्यपालांना पदमुक्त करावे;आदित्य ठाकरे यांची मागणी
![Governor should be dismissed; Aditya Thackeray's demand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/aaditya-thackeray-9-4-780x470.jpg)
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी पदमुक्त करावे, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर वाट दाखविणारे आदर्श मानणार की वाट लावणारे, असा खोचक टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना मारला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचे हे पहिले वक्तव्य नसून त्यांनी अनेकदा अशी वक्तव्ये केली आहेत. हे सर्व जाणूनबुजून होते की, काय, अशी शंका व्यक्त करून आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी असे वादग्रस्त व्यक्तव्य करणे अपेक्षित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आजोबा बोलायला लागले आहेत
आता आजोबा बोलायला लागले आहेत. आदर्श कोणाला मानायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. लोकशाही आहे. पण वाट दाखविणारे आदर्श मानणार की वाट लावणारे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उद्देशून मारला.
खासदार संजय राऊत यांची टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने महाराजांचा माफीवीर उल्लेख करूनही शिंदे गट सत्तेला चिकटून कसा? आता कोणाला जोडे मारणार, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनीसुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त करून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली.