बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत
![Deputy Chief Minister Ajit Pawar welcomes the decision to lift the ban on bullock cart races](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/5c8a2e36-8414-413a-a7e9-c680be33d9d9.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
“राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करणे हा एक तमाम शर्यत प्रेमींसाठी चांगला निर्णय असून, हा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा मोठा विजय आहे. यासाठी #MVA सरकारने सुप्रीम कोर्टात केलेल्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे. बैलगाडा मालकांच्या सातत्य व अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. #बैलगाडा_शर्यत pic.twitter.com/tAEynfAKSv
— Parth Pawar (@parthajitpawar) December 16, 2021