इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
![Dates of Class X-XII examinations announced, announced by the Minister of Education](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/varsha-gaikawad-new.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
कोरोना काळात इयत्ता दहावी आणि बारावीच्या महत्वाच्या बोर्डाच्या परीक्षांवर नियंत्रण आलं होतं. परीक्षा कधी होणार इथपासून ते ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे प्रश्न पडले होते. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्चपासून तर इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण दहावी आणि बारावी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल.”
तर, प्रात्यक्षिक परीक्षांबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “१२वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तर १०वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होईल.”
ऑफलाईन की ऑनलाईन परीक्षा होणार
दरम्यान, कोरोना काळात परीक्षांचं स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धती यामध्ये बदल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता त्याविषयी काय पद्धत असेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. “मागील काळात जशी ऑफलाईन परीक्षा होत होती, तशीच आता होणार आहे. पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन देखील तशाच स्वरूपाचं असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं.
कधी लागणार निकाल?
दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. १२वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.