सर्वत्र नाकाबंदी आणि शुकशुकाट; नाईट कर्फ्यूदरम्यान थांबली मुंबई
मुंबई – राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदीचा प्रभाव राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये दिसून आला.
जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी काल सायंकाळपासूनच मुंबई पोलिसांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची अधिक प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली. शहरात अनेक ठिकाणी प्रामुख्याने पोलिसांच्या गाड्यांचे आणि रुग्णवाहिकांचेच सायरन ऐकू येत होते.
दरम्यान, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, सागरी किनारे, बगीचे, उद्याने रात्री ८ वाजताच बंद करण्याच्या सुचना करण्यात आल्या असून पहिल्याच दिवशी या सुचनांचे कडेकोटपणे पालन होताना दिसून आले. १५ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या या जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे.