आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची खलबतं सुरू;
![BJP's agitation for the upcoming Lok Sabha elections begins;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-02-at-4.22.37-PM.jpeg)
पदाधिकारी, नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं?
मुंबई ।
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाने महाराष्ट्रात मिशन ४५ अभियान सुरू केले असून याचा आढावा घेण्याकरता आज दुपारी बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना केंद्रात आपली हवा कायम ठेवण्याकरता भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात मिशन ४५ अभियान राबवण्यात येत आहे. याअभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचा आढावा घेण्याकरता महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली होती. भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडली. महाराष्ट्रात भाजपाला ४५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
४५ जागांचं ध्येय ठेवलेलं असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यासाठी काय योजना आहेत, त्यासाठी कशी तयारी सुरू आहे, याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच, येणाऱ्या योजनांसाठी उद्या विभागीय संगटन मंत्री, लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.
महापालिकेसाठी १५० मिशन
सप्टेंबर महिन्यात अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी संबोधित करताना ‘मिशन 150’ असे म्हणत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडला. यावेळी अमित शाह यांनी “मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होईल. प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आला पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व फक्त भाजपाचे असावे”, असे वक्यव्य केले. एकिकडे भाजपा आणि शिवसेनेचा वाद कायम आहे. मात्र दुसरीकडे नुकताच शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपाशी युती करत राज्याच सरकार स्थापन केलेल्या शिंदे गटाला भाजपा योग्य वागणूक देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.