कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना
![Anil Deshmukh's judicial remand extended by 14 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/anil-deshmukh-new.jpg)
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता ते सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, असे म्हटले जात आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी देशमुख यांच्यावतीने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. यावेळी ‘आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला कायदेशीर हक्क मिळतात. २६/११च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाबलाही कायद्याचा लाभ मिळाला होता’, असे म्हणत ‘माझ्यावर गुन्हा दाखल करताना सीबीआयने कायद्याला बगल दिली’, असा आरोप देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच हा युक्तिवाद पूर्ण न झाल्याने देशमुख यांच्या याचिकेवर आता सोमवारी 5 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीकडून आता तिसरा समन्स पाठविण्यात आला आहे. ५ जुलै रोजी ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश यापूर्वीच्या दोन समन्समध्ये देण्यात आले होते. या समन्सना देशमुखांनी आपल्या वकिलांमार्फत उत्तर दिले. त्यानंतर आता त्यांना तिसरे समन्स पाठविण्यात आले आहे.