ठाणे-रायगडमधील भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांच्या २ हजार ५२१ घरांची सोडत
![Allotment of 2 thousand 521 houses of mill workers in leased housing project in Thane-Raigad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/mhada-1.jpg)
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे-रायगडमधील भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांच्या २ हजार ५२१ घरांची सोडत काढण्यात येणार होती. ती काही महिन्यांपासून रखडली आहे. पण या सोडतीला मुहूर्त मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडतीची संपूर्ण तयारी झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा आहे. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार २०१६ मध्ये कोन, पनवेलमधील २ हजार ४१८ घरांसाठी सोडत काढण्यात आली.
यानंतर मुंबई मंडळाला सोडतीसाठी एमएमआरडीएकडून आणखी २ हजार ५२१ घरे २०२० मध्ये उपलब्ध झाल्याने या घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती. मात्र, २०२० मध्ये करोनाचे संकट आल्यानंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २०१६ च्या सोडतीसह आगामी सोडतीतील ५००० हून अधिक घरे अलगीकरणासाठी घेतली. परिणामी २०१६ च्या सोडतीतील घरांचा ताबा रखडला आणि सोडतही रखडली. ही घरे लवकरात लवकर परत मिळावीत यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना नोव्हेंबर २०२१ मध्ये यश आले.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी घरे परत केली; मात्र त्यांची दुरवस्था झाली आहे. अखेर एमएमआरडीएने नादुरुस्त घरे म्हाडाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. पण घरांची दुरुस्ती कोण करणार यावरून वाद निर्माण झाल्याने पुन्हा सोडत रखडली होती. तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यानंतर हा वाद मिटविला. म्हाडाने दुरुस्तीचे काम करावे आणि एमएमआरडीएने यासाठीचा खर्च द्यावा असा तोडगा काढण्यात आला होता. हा तोडगा निघाल्यानंतर १ मे रोजी सोडत निघेल असे जाहीर केल होते.