वंदे भारत एक्सप्रेसची अहमदाबाद मुंबई चाचणी संपन्न; सव्वा पाच तासात ४९३ किलोमीटर अंतर कापले
![Ahmedabad Mumbai trial of Vande Bharat Express completed; A distance of 493 kilometers was covered in five and a half hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/vande-bharat-express-trail.jpg)
पालघर : गेल्या तीन वर्षापूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची चाचणी आमदाबाद- मुंबई दरम्यान आज संपन्न झाली. ४९३ किलोमीटरचे अंतर सव्वा पाच तासात या गाडीने पार केले. ही गाडी ऑक्टोबर नंतर पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर कार्यरत होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) पद्धतीचा हा रेक असून चार डब्यांचे चार संच आहेत. १३० ते १८० तशी किलोमीटर धावणाऱ्या या वातानुकूलित गाडीला चार संचामध्ये चार इंजिन आहेत. ही गाडी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान प्रथम धावण्यात आली. त्यानंतर अशीच सेवा नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान कार्यरत आहे. विमानाप्रमाणे आरामदायी सरकणाऱ्यार खुर्च्या या गाडीत असून १६ डब्यांची या गाडीची लांबी ३८४ मीटर इतकी आहे.
वंदे भारत एक्सप्रेस च्या सुधारित स्वदेशी रेक ची गाडी आज आमदाबाद स्थानकातून सकाळी ७.०६ वाजता निघाला व ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानक दुपारी १२.१९ वाजता पोचली. परतीच्या प्रवासाला दुपारी १.०९ वाजता मुंबई येथून निघून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारात अहमदाबाद येथे पोहोचली असे सांगण्यात आले. सध्या या मुंबई अहमदाबाद मार्गावर कमाल १३० किलोमीटर प्रति तास या वेगमर्यादेने धावणाऱ्या या गाडीला सव्वा पाच तास लागले असले तरी आगामी काळात विविध थांबे गृहीत धरून साडेपाच ते पावणे सहा तासात मुंबई अहमदाबाद दरम्यानचे अंतर कापेल अशी शक्यता आहे. या गाडीचे वायुगतिकीय (एरो डायनामिक) आकर्षक स्वरूप तसेच अधिक प्रवेग क्षमता असल्याने या गाडी मधून आरामदायी प्रवास होईल असे रेल्वे प्रशासनाला वाटत आहे. या गाडीच्या चाचणी दरम्यान चित्रीकरण करण्यासाठी अनेक रेल्वे चाहते ठीक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकावर जमा झाले होते.