राज्य सरकारसाठी सल्लागार मंडळ ; आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधांवर भर
![Advisory Board for State Governments; Emphasis on health, education, agriculture, infrastructure](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/mantralay.jpg)
मुंबई : आरोग्य, शेती, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा आणि त्यासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी सरकारला वेळोवेळी सल्ला देण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ गठित करण्यात येणार आहे.
सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारचा प्राधान्यक्रम निश्चित करताना प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था दयनीय असून आदिवासी भागातील लोकांना आजही उपचारासाठी धडपड करावी लागते. त्यामुळे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करण्यात येणार असून तेथेच विविध तपासण्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपराचासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी लागू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरम्णाची पुढील शैक्षणिक वर्षांपासून राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील शाळा आणि शिक्षणाचाही दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी वॉररूमची व्यवस्था निर्माण करण्यात आली असून रोजगारनिर्मितीवरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक कशी होईल. त्यातील अडचणी कशी दूर होतील आणि लोकांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल या दृष्टीने या योजनांची, धोरणांची आखणी करण्यात येणार असून त्यासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. यात विविध क्षेत्रांतील जाणकार आणि तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असून हे सल्लागार मंडळ महिन्यातून दोन वेळा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करतील. या सल्लागार मंडळाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.