काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यात ९६ टक्के मतदान
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी मुंबईत टिळक भवन व राजीव गांधी भवनात प्रचंड उत्साही वातावरणात मतदान पार पडले. प्रदेश काँग्रेसच्या ९६ टक्के व मुंबई काँग्रेसच्या ९७ टक्के प्रतिनिधींनी मतदान केले. या वेळी राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या ५६१ पैकी ५४२ प्रतिनिधींनी म्हणजे ९६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात टपालाद्वारे करण्यात आलेल्या मतदानाचाही समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आमदार कृष्णा पुनिया यांच्या देखरेखीखाली मतदान पार पडले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुंबई काँग्रेसच्या २३७ पैकी २२९ प्रतिनिधींनी मतदान केले, एकूण ९७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. आझाद मैदान येथील राजीव गांधी भवनमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री प्रा. वर्षां गायकवाड, आदी नेते व पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंजाब येथील बुथमध्ये मतदान केले. तर भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्या जेनेट डिसूझा आणि सचिन राव यांनी कर्नाटकमध्ये मतदान केल्याची माहिती देण्यात आली.