हडपसरमध्ये दूधाचा टँकर फोडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/hqdefault-1.jpg)
मुंबई – दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मंगळवारी पुण्यात हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला. कालही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतले होते. काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या.
मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा त्यामागे हेतू होता. पण अद्यापपर्यंत तरी स्वाभिमानला त्यात यश आलेले दिसत नाही. कारण मंगळवारी मुंबईत कुठेही दूधाची टंचाई जाणवली नाही. मुंबईत दुधाचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. मुंबईत दुधाच्या गाडया फोडण्याचे किंवा दूध ओतून देण्याचे प्रकार कुठे घडू नयेत यासाठी पोलिसांनी मुंबईच्या प्रवेशद्वारापासून ते दूध केंद्रापर्यंत प्रत्येक गाडीला संरक्षण दिले होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेत या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. गायीच्या दूधाला प्रतिलिटर २७ रुपये दर मिळाला पाहिजे. प्रतिलिटरमागे शेतकऱ्यांचे १० रुपयांचे नुकसान होत आहे असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. सरकारने रिलायन्स किंवा रामदेव बाबांचे दूध कधी येईल याची वाट पाहू नये तात्काळ निर्णय घ्यावा असे धनजंय मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी फेटाळली राजू शेट्टींची मागणी
राज्यातील एकूण दूध उत्पादनापैकी फक्त ४० टक्केच दूध सहकारी संघामार्फत, तर ६० टक्के दूध हे खाजगी संघामार्फत संकलित होते. खाजगी दूध संघाकडे शेतकऱ्यांची कसलीच आकडेवारी नाही. त्यामुळे जर दुधासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले तर त्यातून नवे घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी अनुदान देणे शक्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी फेटाळून लावली. खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे आहे. राज्य सरकारची चर्चेची द्वारे नेहमीच खुली असून शेट्टींसोबत चर्चेची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.