सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची, मार्चमध्ये कायदा करणार – सुभाष देसाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3-22.jpg)
मुंबई|महाईन्यूज|
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत पुढील महिन्यात होत असलेल्या अधिवेशात कायदा करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सुभाष देसाई बोलत होते.
ते म्हणाले, सध्या राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत राज्यात २५ हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. तेथे मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते. अशा या सर्व शाळांत मराठी विषय शिकवणे सक्तीचे केले जाणार आहे. यासंदर्भात कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
जुने उपक्रम सुरू राहणार
मागील सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव, रंगवैखरी आदी उपक्रम यापुढेही सुरू राहतील. भिलार येथे पुस्तकांचे गाव हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याची व्याप्ती वाढवण्याचा शासन प्रयत्न करील, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा वापराबद्दल मंत्रालयात सक्ती
सर्व व्यवहार मराठीतून झाले पाहिजे, असा शासनाचा मानस आहे. मंत्रलायात त्याची सुरुवात झाली आहे. मराठी भाषेतून नस्तीवर अभिप्राय देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जर मराठीत टिपण्णी आली नाही, तर ती नस्ती स्वीकारली जाणार नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मंत्रालयाबाहेरील शासकीय, निमशासकिय संस्थामध्ये मोठ्या प्रमाणात इंग्रजीचा वापर होत आहे. त्यावर पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासंदर्भातील अहवाल मागवण्यात आला आहे.