सत्ता येऊ द्या, निवडणूक आयोगालाच जेलमध्ये टाकेन : प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Prakash-Ambedkar-2.jpg)
यवतमाळ : पुलवामाची घटना मॅच फिक्सिंग असून, यावर काही बोलले की निवडणूक आयोग रोखतं, ही यंत्रणा भाजपाच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या. यांनाही जेलची हवा खायला पाठवू, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.
तसेच, सध्याचे भाजप सरकार बिनडोकांचे सरकार असून, त्याचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित सभेच्या व्यासपीठावरुन त्यांनी हे वक्तव्य केले. दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित प्रचारसभेच्या मंचावरुन त्यांनी जाहीरपणे हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र ओवेसी या सभेला आले नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या 25 मिनिंटाच्या भाषणात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली.
भाजप आणि काँग्रेस या या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेऊन डाव्यांच्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. शिवाय, आम्ही सत्तेत आल्यावर केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस जेलमध्ये असेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.