संपामुळे ‘बेस्ट’ला १५ कोटींचा फटका
- आजवरचा सर्वाधिक लांबलेला संप
बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबलेला संप ठरला आहे. त्यामुळे बेस्टला १५ कोटींहून अधिक महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
यापूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १९९७, २००७ आणि २०११ मध्येही संप केले होते. २०१७ मध्ये सानुग्रह अनुदान व अन्य मागण्यांसाठी एक दिवसाचा संप झाला होता. त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्टला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. त्याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त तीन दिवसांचे संप केले आहेत. १९९७मध्ये शरद राव अध्यक्ष असताना तीन दिवसांचा संप झाला होता. त्यानंतर २००७ मध्ये उत्तम खोब्रागडे महाव्यवस्थापक असताना काही कामगारांना तडकाफडकी काढण्यात आले होते व नवीन कामगार भरती करण्यात आली होती. तर २०११ मध्येही विविध मागण्यांसाठी तीन दिवसांचा संप करण्यात आला होता. परंतु यंदा ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप दीर्घकालीन ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता शिवसेना नेते उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हस्तक्षेप करूनही संप मिटलेला नाही. त्यामुळे संपाच्या सातव्या दिवशीही मुंबईकरांना एसटी, रिक्षा, टॅक्सी, खासगी बस यांसह अन्य पर्यायी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागले. याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘संपामुळे आमचा महसूलही बुडाला आहे. प्रवाशांचेही हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे.’
मनसेचे आंदोलन
संप एसटीच्या पथ्यावर
बेस्ट संप सुरू झाल्यापासून एसटी महामंडळ दररोज जादा बस गाडय़ांची सेवा मुंबईकरांना देत आहे. त्यामुळे एक ते सव्वा लाख रुपये महसूल एसटीला मिळत असल्याची माहिती देण्यात आली. सोमवारी महामंडळाने १६० बस गाडय़ा सोडल्या.