श्रीलंकापाठोपाठ भारतातही ‘बुरखा बंदी’ लागू करा ; उद्धव ठाकरेंची पीएम मोदींकडे मागणी
मुंबई – भारतात बुरखा आणि नकाब बंदी लागू करा अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी सामनातून लिहिलेल्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशा स्वरुपाचे आदेश काढण्यास सांगितले. श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ल्यानंतर आणीबाणी व त्यानंतर बुरखा बंदी लागू करण्यात आली. उद्धव यांच्या मते, बुरखा किंवा नकाब घालून चेहरा लपविणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब घालणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जावे. श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनने सुद्धा दहशतवादविरोधात कठोर पावले उचलून ही बंदी लागू केली असे उद्धव यांनी सांगितले.
रावणाच्या लंकेत झाले, रामाच्या अयोध्येत कधी?
आणीबाणीत असलेल्या श्रीलंकेने चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी लागू केली. तेथील राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय धाडसी आणि धैर्याचे दर्शन घडवणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ट्रिपल तलाक रद्द करून पीडित मुस्लिम महिलांना न्याय दिला. परंतु, दहशतवादविरोधात कठोर पावले कधी उचलणार आहेत. त्यांनी अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “जम्मू आणि काश्मीर इस्लामी दहशतवादाने त्रस्त आहे. श्रीलंका, न्यूझीलंड, फ्रान्स आणि ब्रिटनने सुद्धा बुरखा आणि नकाब बंदी लागू केली. मग, भारत मागे का?”
“मुस्लिमांमध्ये कुणी फुले शाहू निर्माण झाले नाहीत…”
भारतातील मुस्लिमांवर भाष्य करताना, “आधी धर्म नंतर राष्ट्र असा मुस्लिम समाजाचा प्राधान्यक्रम आहे. इस्लाम धर्म देखील फालतू रुढी-परंपरांमध्ये अडकला आहे. मुसलमानांत कुणी शाहू, फुले निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. याच कारणांमुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू, अबु आजमी यांचे फावले आहे.” उद्धव ठाकरेंनी अग्रलेखात या सर्वांना धर्मांध आणि माथेफिरु म्हटले आहे.