शिवसेनेनं एनडीएतूनबाहेर पडावं – नवाब मलिक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/NCP-Shiv-Sena.jpg)
मुंबई । शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची की नाही याबाबत राष्ट्रवादीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावं. त्यानंतर सरकार स्थापन्यासाठीचा आम्हाला प्रस्ताव द्यावा, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी आम्ही सध्या राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. ते काय निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असं मलिक म्हणाले. तसेच भाजपने सत्ता स्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर जयपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेसच्या आमदारांच्या गोटात खलबतं सुरु झाले आहेत.
सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटी बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले. राज्यपालांची भेट घेऊन आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची आजच्या दिवसभरातील दुसरी बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर कोअर कमिटीच्या सदस्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून भाजप सरकार स्थापन करण्यास असमर्थ असून भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यासह न अन्य काही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. असे भाजपने जाहीर केल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. रविवारी दुसरी कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले.