वीज पुन्हा महागली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/power.jpg)
मुंबई – मुंबईसह राज्यातील वीजग्राहक दरवाढीच्या चटक्यांनी त्रासलेले असताना आता विजेच्या विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या विद्युत शुल्कात राज्य सरकारने १० पैशांनी वाढ केल्याने वीज पुन्हा महाग झाली आहे. १ जानेवारी २०१९ पासून हे वाढीव विद्युत शुल्क लागू करण्यात आले आहे.
मुंबईतील टाटा, अदानी व बेस्टच्या व्यावसायिक-औद्योगिक ग्राहकांना प्रतियुनिट २४.०४ पैसे विद्युत शुल्क आकारले जाते. ते १० पशांनी वाढवून ३४.०४ पसे करण्यात आले आहे. निवासी ग्राहकांचे विद्युत शुल्क १६.०४ पैशांवरून २६.०४ पैसे करण्यात आले आहे. यामुळे २०० युनिट वीज वापरणाऱ्या निवासी ग्राहकांना २० रुपये तर ५०० युनिट वापरणाऱ्यांना ५० रुपये अधिक मोजावे लागतील.
मुंबईच्या पूर्व उपनगरांसह राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या निवासी ग्राहकांना या विद्युत शुल्कवाढीतून दिलासा देण्यात आला आहे. मात्र व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना १० पसे वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.
राज्यात कृषीपंपांची जोडणी देण्यासाठी महावितरणने सौर कृषीपंप योजना लागू केली आहे. त्यासाठी राज्यातील वीजग्राहकांनी थोडे योगदान द्यावे लागेल, असे सूतोवाच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. याबाबतचा प्रस्तावही राज्य मंत्रिमंडळाच्या बठकीत मंजूर झाला होता. त्यानुसार आता हा वाढीव विद्युत शुल्काचा आदेश जारी करण्यात आल्याचे समजते.