‘लोकल रेल्वे’ सुरू करण्यावर राज्य सरकार सकारात्मक – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्याचे अर्थचक्र मुंबईच्या गतीशील असण्यावर अवलंबून आहे. मात्र यात लोकल रेल्वे बंद असल्याचा अडसर अनुभवला जात आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी; मुंबईत त्यावर बर्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आगामी काळात लोकल रेल्वे सुरू करण्याचा राज्य सरकारचा सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे; मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिली.
राज्यात ठप्प असलेले उद्योग-व्यवसाय टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जात आहे. मंत्रालयात उपस्थिती कमी असून त्यासाठी लोकल रेल्वे जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. मुंबईच्या लोकल रेल्वे गाड्या सुरू झाल्यास मुंबई पूर्वपदावर येणार आहे. त्यामूळे राज्यातील अर्थकारण गतिमान होणार असल्याने; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.