रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस
मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम 273 अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला आहे. त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. तसेच अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोप करत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार सभागृहात आक्रमक झाले.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. त्यांचं हे वागणं हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामी यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला. तसेच या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.