राज्यात सायबर हल्ल्यांना सुरुवात, लसीकरणाबाबत गृहमंत्र्यांनी केलेलं आवाहन वाचा
![Cyber attacks start in the state, read the appeal made by the Home Minister regarding vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Anil-Deshmukh.jpg)
मुंबई – आजपासून संपूर्ण देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्रतही लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरणाला सुरुवात होताच सायबर हल्ले होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लसीकरणासंदर्भात कोणाचाही फोन आल्यास स्वत:ची माहिती देऊ नका असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
वाचा :-नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावं: राजेश टोपे
राज्यात करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे. “राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.
वाचा :-‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
“अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो. तसेच या फोन कॉल्सची नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी. जेणेकरून पोलीस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील,” असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.