राज्यात अतिवृष्टीचा इशारा…
![Rainy season in the state for the next week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/rain.jpg)
मुंबई – मान्सुनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावल्याने उष्णतेपासून मेटाकुटीला आलेल्या नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी पुढील सहा दिवस धोक्याचे आहेत. उद्या, गुरुवारी 7 ते सोमवार 11 जून दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकण किनारपट्टीजवळील जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पाश्वभूमीवर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन राज्यातील विशेषतः कोकण भागातील जिल्हा प्रशासनास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवून अशा परिस्थितीत योग्य ती दक्षता घेण्याच्या व नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस व अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या, 7 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार, 8 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची व अतिवृष्टीची शक्यता असून रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
शनिवार, 9 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची व अतिवृष्टीची शक्यता आहे. तर 10 व 11 जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई व नजिकच्या परिसरांसह बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा अंदाज आहे.