मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ; मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काहींचे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले. मात्र मुंबईकरांसाठी यात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आणि मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. मागील 24 तासांत मुंबईसह ठाण्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. मुंबई उपनगरांत आणि ठाण्यात रात्रीच्या वेळी सर्वाधिक पाऊस पडला. येत्या 24 ते 48 तासांत मुंबईसह अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असून मधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याबाबतची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
आज सकाळपासून मुंबईतील अनेक भागांत आकाश निरभ्र दिसत आहे. पुढील 24-48 तासांत मुंबईत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या धरण आणि तलावक्षेत्रामध्ये ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने मागे घेतला आहे.
मुंबईला सात तलावांच्या माध्यामातून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी आता विहार, तुलसी आणि मोडक ही तलावं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. अन्य चार तलावांमध्येही मागील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्याने आता मुंबईसमोरील पाण्याचे संकट काही अंशी कमी झाले आहे.