मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाबाबत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून घेतला आढावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/narendra-modi-and-uddhav-thackeray.jpg)
मुंबईसह अनेक उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मुंबईतल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. केंद्र सरकार सर्वतोपरी राज्य सरकारला मदत करेल, अशी आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आणि काळजी घेण्यास देखील सांगितले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-16.jpg)
मुंबईला सलग दोन दिवस पावसाने झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील, असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितलंय.
मुंबईमध्ये काल एका दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय. मस्जिद रेल्वे स्थानकात अडकलेल्या २९० प्रवाशांची एनडीआरएफने सुखरुप सुटका केली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे.