‘मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’
मुंबई – धनंजय मुंडेंनी स्वतः जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिली आहे. मात्र, तरीही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.
वाचा :-भाजपा महिलाचा मोर्चा धनंजय मुंडे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार!
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज (16 जानेवारी) सकाळी कोरोना लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या प्रकरणाबाबत आपले मत मांडताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
“धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाबाबत स्वतः कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु विरोधकांकडून याप्रश्नी नाहक राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते,” असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच, ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील, असा विश्वासदेखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे यांनी जनतेसमोर स्वतः कबुली दिली आहे. एखादा माणूस अशी कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची 30 वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू, असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.