मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/20190702_090158.jpg)
मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 13 जखमी झाले आहे. या सर्व जखमींवर शताब्दी आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना झाली होती, त्यात 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुंबईतील मालाड परिसरात भिंत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या पाच दिवसापासून मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात तर पाणी साचत आहेच, पण अनेक घरातही पाणी शिरलं आहे.
मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मालाड सबवे येथे 10 ते 12 फूट पाणी साचले होते.असं असताना देखील या ब्रिज खालून स्कॉर्पिओ कारने प्रवास करणाऱ्या दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 6 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन जवान आणि स्थानिकांनी पहाटे 4 वाजता स्कॉर्पिओ बाहेर काढली.