माढ्यातील ‘त्या’ प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनी बारामतीत दिलं!
बारामती | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्तानाट्यानंतर काल पहिल्यांदाच एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील माढा इथं एका शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त दोघेही एकत्र आले. सत्तानाट्यानंतर दोघेही एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं.
हे दोघेही मंचावर शेजारी-शेजारी बसले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अजित पवारांनी आज बारामतीत याचं उत्तर दिलं. अजित पवार हे आज बारामतीत आहेत. बारामतीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. यावेळी त्यांना माढ्यात देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा झाली, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “संजयमामा शिंदेंच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी होत. त्यावेळी त्यांना मी हवा पाण्याबद्दल विचारलं”