महाअधिवेशनाच्या दिवशीच MSEB कडून वीजपुरवठा बंद?; मनसेचा इशारा…
मुंबई | महाईन्यूज
विधानसभा निडवणुकीमध्ये शंभर जागा लढवूनही केवळ एकमेव आमदार निवडून आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकण्याच्या तयारीत आहे. २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरेंच्या पक्षाने हिंदुत्वाची कास धरण्याची संपूर्ण तयारी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र मनसेच्या या महाअधिवेशनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून (एमएसईबी) भारनियमन केलं जाणार आहे. याविरोधात आता मनसेचे आवाज उठवलेला आहे.
२३ जानेवारी रोजी होणाऱ्या सकाळी नऊ ते सायंकाळी सहादरम्यान मनसेच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र याच कालावधीमध्ये एमएसईबीकडून भारनियमन केलं जाणार आहे. यासंदर्भातील मेसेजेसही राज्यातील विविध भागातील ग्राहकांना केला जात आहे. महत्वाचे काम असल्याने २३ जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान विजपुरवठा बंद ठेवला जाईल असं या मेसेजेसमध्ये सांगण्यात आलेलं आहे.
मुद्दाम मनसेच्या अधिवेशनाच्या काळातच वीज पुरवठा खंडित करण्याचा हा डाव असल्याची टीका मनसेने केलेली आहे. “सरकारला असं काही करुन साध्य होणार नाही. हे खालच्या पातळीवर जाऊन केलेलं राजकारण आहे. ग्रामीण भागामध्ये असे संदेश अनेकांना गेले आहेत. त्यामुळेच असं केल्याने काहीच मिळणार नाहीय. तसेच एमएसईबीला यासंबंधी योग्य पद्धतीने जाब विचारला जाणार आहे,” असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे. देशपांडे यांनी या मेसेजेचा स्क्रीनशॉर्टही ट्विट केलेला आहे.